Thursday, March 28, 2024
Homeक्रीडाIND vs BAN : जखमी रोहित भिडला... पण विजय निसटला

IND vs BAN : जखमी रोहित भिडला… पण विजय निसटला

बांगलादेशची ५ धावांनी रोमहर्षक जीत; मालिकाही खिशात

मीरपूर (वृत्तसंस्था) : मेहेदी हसन मिर्झाच्या धडाकेबाज अर्धशतकामुळे बांगलादेशने बुधवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (IND vs BAN) भारतावर रोमहर्षक विजय मिळवत मालिकाही खिशात घातली. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात जखमी झालेला भारतीय कर्णधार रोहित शर्माने आठव्या जागेवर फलंदाजीला येत यजमानांना घाम फोडला होता. मुस्तफिझुरने शेवटचा निर्णायक चेंडू अप्रतिम फेकत भारताच्या मालिका वाचविण्याच्या स्वप्नांना धुळीस मिळवले.

बांगलादेशने उभारलेल्या २७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या भारताला सुरुवातीला एकामागून एक धक्के बसले. अवघ्या ६५ धावांवर भारताचे ४ फलंदाज तंबूत परतले होते. विराट कोहली, शिखर धवन, वॉशिंग्टन सुंदर, लोकेश राहुल या आघाडीच्या आणि भरवशाच्या फलंदाजांनी निराश केल्यामुळे भारताला विजय मिळवून देण्याची जबाबदारी आपसुकच मुंबईकर श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू अक्षर पटेल यांच्या खांद्यावर आली. या दोन्ही फलंदाजांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावली.

श्रेयस अय्यरने ८२, तर अक्षर पटेलने ५६ धावा करत भारताच्या विजयाच्या आशा दाखवल्या होत्या. हे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर पुन्हा भारतीय संघ अडचणीत आला. त्यावेळी दुखापतग्रस्त रोहित शर्मा भारताच्या मदतीला धावून आला. रोहितने २८ चेंडूंत नाबाद ५१ धावा ठोकत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले होते. शेवटच्या दोन चेंडूंवर १२ धावांची आवश्यकता असताना रोहितने एक षटकार लगावत बांगलादेशला धडकी भरवली. मुस्तफिझुरने शेवटचा निर्णायक चेंडू अप्रतिम फेकत भारताच्या मालिका वाचविण्याच्या स्वप्नांना सुरुंग लावला. बांगलादेशने ५ धावांनी विजय मिळवत मालिकाही जिंकली.

तत्पूर्वी, मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यातप्रमाणेच दुसऱ्या सामन्यात देखील नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूने लागला. भारतीय संघाला नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करावी लागली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशसाठी त्यांचे सलामीवीर फलंदाज काही खास कामगिरी करू शकले नाहीत. सलामीला आलेला अनामुल हक आणि लिटन दार यांनी अनुक्रमे ११ आणि ७ धावांची खेळी केली. महमदुल्लाह याने ७७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर मेहदी हसन मिराज याने पुन्हा एकदा गुणवत्ता दाखवली. हसनने बांगलादेशसाठी सर्वाधिक १०० धावा केल्या.

गोलंदाजीत भारताचा वॉशिंगटन सुंदर किफायतशीर ठरला. सुंदरने १० षटकांमध्ये ३७ धावा देत सर्वात जास्त तीन विकेट्स घेतल्या. भारताचा युवा वेगावन गोलंदाज उमरान मलिक याला या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली गेली होती. मलिकने मिळालेल्या संधीचा फायदा उचलत महत्त्वाच्या दोन विकेट्स घेतल्या. यादरम्यान, त्याने ५८ धावा दिल्या. सिराजने दोन विकेट्स घेतल्या, पण यादरम्यान त्याने तब्बल ७३ धावा दिल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -