Wednesday, April 24, 2024
Homeसाप्ताहिककोलाजआरोग्यं मूलं उत्तमम्

आरोग्यं मूलं उत्तमम्

डॉ. लीना राजवाडे

वाचकहो आपण नवीन वर्षाची सुरुवात “आरोग्यं धनसंपदा” या आश्वासक संदेशाने केली. हाच संदेश घेऊन पुढे जाऊया. आजच्या लेखात पाहूया आरोग्यपूर्ण जीवन याविषयी भारतीय वैद्यकशास्त्र नेमके काय सांगते.
“धर्मार्थ काममोक्षाणां आरोग्यं मूलमुत्तमम्।”यातील धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या संकल्पना आपण आजच्या काळात नव्याने समजून घ्यायचा मागील लेखात प्रयत्न केला. ‘आरोग्यं मूलं उत्तमम्’ म्हणजे उत्तम आरोग्य हे या चारही गोष्टी (धर्म, अर्थ, काम, मोक्ष साध्य करण्यासाठी) का आवश्यक आहेत, हे बघूयात. लहान मुलांना अभ्यास करायचा असो किंवा आरोग्य सेवकाला आरोग्य कर्मचारी म्हणून काम करायचे असो, उत्तम आरोग्याला पर्याय नाही.
आज आधुनिक काळातदेखील ‘आरोग्यं धनसंपदा’ हे सांगताना त्यात शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक गोष्टींचा समावेश केलेला आपल्याला दिसतो.
भारतीय वैद्यकशास्त्र या आरोग्याविषयी काय नेमके सांगते हे आता पाहूया.
मागील लेखात १४ विद्या आणि ६४ कला अशा गोष्टींचाही मी उल्लेख केला. तर गंमत म्हणजे भारतीय वैद्यक हे दोन्हीही आहे. कलाही आणि शास्त्रही.
विश्वकोषात देखील बघितले तरी असे समजते की, मुळात वैद्यक हे वैज्ञानिक माहिती आणि पद्धती यांवर आधारलेले आहे. भारतीय वैद्यक केवळ औषधी विज्ञान सांगणारे नव्हे, तर माणसाला स्वत:विषयी सजग व्हायला, हाडा-मांसानी बनलेल्या या शरीराची रचना कशी असते, त्या शरीरात चयापचयक्रिया कशा घडतात, नव्हे तर या शरीरात चैतन्य कसे येते? इतका सूक्ष्म विचार विज्ञानाधिष्ठीत प्रमाणाने मांडणारे शास्त्र आहे.
‘आरोग्यं मूलमुत्तमम्’ ही संकल्पना स्वास्थ्य म्हणजेच आरोग्याशी निगडीत आहे.
“प्रसन्न आत्मेन्द्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते।”
या ठिकाणी एक गोष्ट मला सुरुवातीलाच सांगायला आवडेल की, अतिशय मूलभूत सिद्धांतावर ज्या शास्त्राची बैठक आहे त्याचे सिद्धांत हे सोपे सूत्ररूपात वेळकाळापासून संहितेमध्ये आहेत. वेदकालात ते श्रुत होते. आज आपल्याला आधुनिक काळात ते संहितामध्ये लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. पण आजही ते सिद्धांत तसेच लागू आहेत.
प्रसन्न आत्मेन्द्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते|
ज्या माणसाचे शरीर उत्साही आणि मन प्रसन्न असते त्याला स्वस्थ म्हणतात.
‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं’ हेच मुळात भारतीय वैद्यकशास्त्राचे प्रयोजन आहे. प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र ज्याला आज आपण आयुर्वेद म्हणून ओळखतो. त्याच्याही काया, बाल, ग्रह, उर्ध्वांग, शल्य, दंष्ट्रा, जरा, वृष म्हणजे वाजीकरण अशा अनेक उपशाखा आहेत.
चरक सुश्रुत वाग्भट अशा आयुर्वेदाच्या ज्या मूल संहिता आहेत, त्यात वैद्यकशास्त्राचे मूळ प्रयोजन सांगितले आहे,
“स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं।”
आरोग्याची मदार ही आहार (खाणे-पिणे), निद्रा (झोप) आणि ब्रह्मचर्य या तीन खांबावर उभी राहते.
आहार – म्हणजे जे आपण खातो, पितो ते पदार्थ. आरोग्यासाठी कोणते पदार्थ खावेत. खाताना काय नियम पाळावेत हे समजून घेतले, तर नक्की सकारात्मक बदल करण्यासाठी उपयोग होऊ शकेल.
मुख्य नियम एकच,
“तन्मना अभिसमीक्ष्यसम्यक भुञ्जीत।”
स्वत:च्या शरीराला काय हितकर आहे, समाधान देणारे आहे ते योग्य पद्धतीने समजून खावे.
निद्रा (झोप) – योग्य प्रकारे, योग्य वेळी मिळणारी झोप हीदेखील शरीराचा उत्साह मनाचा तजेला टिकवण्यासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट.
ब्रह्मचर्य इथे इंद्रिय संयम अपेक्षित आहे. मन प्रसन्न राहण्यासाठी हा तिसरा आवश्यक घटक आहे. आहार, निद्रा इंद्रिय संयम हे तीनही खांब भक्कम असायला हवेत. त्यासाठी त्यांची मुळात ताकद उत्तम असायला हवी.
आपण जे जेवण खाणार ते सकस हवे. ‘ऐसा कुछ खाओ जो आंग को लगे!’ खाण्या-पिण्याच्या पदार्थांची ताकद किंवा पोषणमूल्ये याचबरोबर माणसाच्या शरीराची आणि मनाची ताकद हासुद्धा तेवढाच स्वतंत्र पण महत्त्वाचा भाग वैद्यकशास्त्रात सांगितला आहे, तोही समजून घ्यायला हवा.
पुढील लेखात आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य या तीन खांबाविषयी अधिक जाणून घेऊ.
“सर्वांना सुख लाभावे
जशी आरोग्य संपदा”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -