मुंबई (हिं.स.) : कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या वादात मुंबई उच्च न्यायालयाने आदर्श वॉटर पार्क ॲण्ड रिसॉर्ट या खाजगी कंपनीचा मालकी हक्क फेटाळला आहे. त्यामुळे राज्य सरकारला तूर्तास दिलासा मिळाला आहे. मात्र अजूनही इतरांच्या मालकी हक्काचा वाद प्रलंबित आहे. मेट्रो कारशेडच्या जमिनीच्या मालकी हक्कावरून निर्माण झालेला मूळ वाद राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात असून तो मिटणे आवश्यक आहे. उपरोक्त वादावर दोन्ही पक्षांकडून मंगळवारी युक्तिवाद पूर्ण झाला आणि त्यानंतर आज (बुधवारी) न्यायालयाने संबंधित खाजगी कंपनीचा मालकी हक्क फेटाळून लावला.
कांजूरमार्ग येथील प्रस्तावित मेट्रो कारशेड येथील जमीन आपल्या मालकीची असल्याचा दावा आदर्श वॉटर पार्कने केला होता. त्या विरोधात राज्य सरकारने न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर आज सुनावणी करताना न्यायालयाने आदर्श वॉटर पार्कचा दावा फेटाळला. आदर्श वॉटर पार्कने चुकीच्या पद्धतीने जमीन (फ्रॉड करून) घेतल्याचे न्यायालयाने मान्य केले. तसेच आदर्श वॉटर पार्कचे मालकी हक्क रद्द केले आहेत.
त्यामुळे आता आता मालकी हक्काबाबत राज्य सरकार, गरोडीया कंपनी आणि केंद्र सरकार या तिघांमध्ये वाद आहे. त्यावर पुढे युक्तिवाद सुरू राहिल. मात्र, ज्या कारणामुळे न्यायालयाने मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे ती स्थगिती उठण्यासाठी आधी राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्यातील मालकी हक्कचा वाद मिटणे आवश्यक आहे. आता आदर्श वॉटर पार्कचा मालकी हक्क रद्द न्यायालयाने रद्द केल्यामुळे मेट्रो कारशेडच्या कामातील एक अडथळा दूर झाला आहे.