Tuesday, April 16, 2024
Homeक्रीडाहरभजन सिंगचे ‘पॅकअप’

हरभजन सिंगचे ‘पॅकअप’

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :
भारताचा ऑफस्पिनर हरभजन सिंगने औपचारिकपणे सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने मागील २३ वर्षांच्या खेळातील प्रवासाला निरोप देत असल्याचं ट्वीट करत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्याने निवृत्ती घोषित करतानाच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या ट्विटमध्ये हरभजनने सर्व चांगल्या गोष्टींना शेवट असतो असं म्हणत त्याच्या आयुष्यातील प्रत्येकाला धन्यवाद दिले.
जालंधरची गल्ली ते भारतीय क्रिकेट संघापर्यंतचा मागील २३ वर्षांचा माझा प्रवास खूप चांगला होता. मी भारतीय क्रिकेट संघाची जर्सी घालून मैदानात उतरलो तेव्हा तेव्हा मला खूप प्रेरणा मिळाली. त्यापेक्षा मोठी प्रेरणा माझ्या आयुष्यात दुसरी कोणती नव्हती. मात्र, आयुष्यात काही कठीण निर्णय घ्यावे लागतात अशी वेळ येते. मला मागील काही वर्षांपासून एक घोषणा करायची होती. तो क्षण तुम्हा सर्वांसोबत शेअर करण्याची मी वाट पाहत होतो. मी क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारातून आज निवृत्ती घेत आहे. खरंतर मनातल्या मनात मी निवृत्ती आधीच घेतली होती, मात्र याची घोषणा करू शकलो नाही. मागील काही काळापासून मी सक्रीय क्रिकेट खेळत नव्हतो. मात्र, कोलकाता नाईट रायडर्ससोबत काही निर्णय ठरला होता त्यामुळे आयपीएलमध्ये मी त्यांच्यासोबत होतो. या काळातच मी निवृत्तीचं ठरवलं होते. अनेक क्रिकेटरप्रमाणे मलाही भारतीय संघाच्या जर्सीतच अलविदा म्हणायचं होतं, मात्र नशिबाला वेगळंच काहीतरी हवं होतं. भारतीय संघ असो, पंजाबचा संघ असो. तसेच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई किंवा कोलकाता असो. मी ज्या संघात खेळलो तिथं मी माझा संघ सर्वोत्तम कामगिरी करावा यासाठी १०० टक्के क्षमतेने काम केले, असे हरभजनने पुढे म्हटले.
हरभजनने यावेळी कसोटीतील पहिल्या हॅट्रिकसह कारकिर्दीतील अनेक गोष्टींना उजाळा दिला. क्रिकेटच्या करियरमध्ये मी कोलकात्यात हॅट्रिक घेतली तेव्हा कमालीचा आनंद झाला. कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा मी भारताचा पहिला गोलंदाज ठरला. त्या कसोटी मालिकेत मी ३ सामन्यांमध्ये ३२ विकेट घेतल्या. तो विक्रम आजही कायम आहे. यानंतर २००७ मधील टी-ट्वेन्टी वर्ल्डकप आणि २०११ वनडे वर्ल्डकपमधील विजय माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा होता. हे अविस्मरणीय क्षण मी आयुष्यभर विसरू शकणार नाही, असे हरभजनने सांगितले.
मार्च १९९८मध्ये कसोटी पदार्पण करणारा हरभजन हा शेवटची कसोटी ऑगस्ट २०१५मध्ये खेळला. त्यात १०३ सामने खेळताना त्याने ४१७ विकेट घेतल्या. याशिवाय त्याच कालावधीत २३६ सामने खेळताना २६९ विकेटची नोंद केली आहे. २८ आंतरराष्ट्रीय सामन्यांत हरभजनच्या नावावर २५ विकेट आहेत. कसोटीत २२२४ धावा करताना हरभजनने २ शतकांसह ९ अर्धशतकेही त्याने झळकावली आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -