पणजी (वृत्तसंस्था): एक गुजराती देशभर फिरू शकतो, तर एक बंगाली का फिरू शकत नाही, असा प्रश्न पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी गोवा येथील असोनोरा भागात झालेल्या एका सभेत केला आहे. गोव्यातील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाबरोबर तृणमूल काँग्रेसने नव्यानेच युती केली आहे. या युतीची पहिली सभा झाली.
मला सांगितलं जातं की मी बंगाली आहे. मग ते कोण आहेत? ते गुजराती आहेत? आपण असं म्हणतो का की ते गुजराती आहेत म्हणून इथं येऊ शकत नाहीत? एक बंगाली देशाचं राष्ट्रगीत लिहू शकतो, पण गोव्यात येऊ शकत नाही? तुम्ही कधी हा प्रश्न उपस्थित केला आहे का की गांधीजी बंगाली आहेत की नाहीत, उत्तरप्रदेशातले आहेत की गोव्यातले? राष्ट्रीय नेता तोच असतो जो सर्वांना सोबत घेऊन पुढे चालत असतो, असे बॅनर्जी म्हणाल्या.