Thursday, March 28, 2024
Homeसंपादकीयतात्पर्य‘अर्धसत्य’, शासकीय नोकरभरतीतील...!

‘अर्धसत्य’, शासकीय नोकरभरतीतील…!

माझे कोकण – संतोष वायंगणकर

महाराष्ट्रात सध्या शासकीय नोकरभरती कशा पद्धतीने होते, त्यातील भरतीप्रक्रियेत कोणतीही पारदर्शकता नाही. संगणकावरच परीक्षा होतात. त्यात काही गोलमाल होत नाही, असे सांगितले जाते; परंतु प्रत्यक्षात संगणकाच्या आडून अधिकाऱ्यांचा असलेला गोंधळ हा आजकालचा नाही. गेली अनेक वर्षे हे अशाच पद्धतीने सुरू आहे. पोलीस भरती, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, ग्रामसेवक भरती या सर्व भरती प्रक्रियेकडे जर तटस्थतेने शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर आजवरच्या शासकीय भरतीत परप्रांतीयांना नोकरीच्या संधी कशा उपलब्ध झाल्या, या प्रश्नाचे उत्तर आणि गुपित दडलं आहे.

महाराष्ट्रात ज्या-ज्या वेळी शासकीय नोकरभरती प्रक्रिया पार पडली, त्या प्रत्येक वेळी कोकणातील भरती प्रक्रियेत सहभाग घेणाऱ्या तरुणांवर अन्यायच झालेला आहे. प्रत्येक वेळी भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात कोकण बाहेरील तरुणांना नोकरीची संधी मिळालेली पाहायला मिळेल. लेखी परीक्षेचे पेपरफुटीचे प्रकार यापूर्वी अनेक वेळा झाले आहेत; परंतु त्याची वाच्चता कुठे झाली नाही की, त्यासंबंधी कोणी तक्रारही कधी केली नाही. आजवर या भरती प्रक्रियेत ‘टॅलेंट’चा मुद्दा पुढे करण्यात आला. राहुरी विद्यापीठाचे सर्टिफिकेट घेऊन येणारे सहज या नोकरभरती प्रक्रियेत ‘सिलेक्ट’ होत राहिले.

या अशा भरतीप्रक्रियेत तक्रार कधी कोणीच केली नाही. बहुतांश राजकीय पुढाऱ्यांनीही याकडे कधीही गांभीर्याने पाहिले नाही. इथल्या भौगोलिक प्रश्नांची माहिती परप्रांतातून आलेल्यांना परफेक्ट कशी काय असू शकते? अगोदर प्रश्न त्यांच्याकडे पोहोचलेले असतात. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा येथील तरुण या परीक्षेत आणि भरती प्रक्रियेत ‘सिलेक्ट’ होतात. शिक्षक, ग्रामसेवक, कृषी, आरोग्य या विभागात भरती झालेल्या उमेदवार बौद्धिकदृष्ट्या एकदम सुमार दर्जाचे असतात. याला काही अपवाद आहेत. मात्र, बहुतांश भरती झालेले हे पेपरफुटीतून ‘सिलेक्ट’ झालेले असतात. शासकीय नोकरभरतीनंतर वर्षभरात त्या-त्या नोकरभरतीचे दरपत्रकही दबक्या आवाजात बाहेर येते, हे सगळे उघड गुपित असते. याला प्रत्यक्ष पुरावे मिळणे अवघड असते. जी लाख मोलाची बोली लागते, ती भाषा ऐकूनच कोकणातील उमेदवार आणि त्यांचे नातेवाईक यांची बोलती बंद होते.

कोकणातील जनता समज करून घेते की, आपल्या कोकणातील तरुणांना परीक्षेत पास होता येत नाही. परप्रांतातून आलेले कँडिडेट हे फार हुशार आहेत; परंतु तसं काही नसते, हे नंतर कधीतरी बाहेर पडतं. कोकणातील शासकीय नोकरभरतीत हे असंच घडलेलं आहे. आपण मात्र भाबडेपणाने परप्रांतात किती हे ‘टॅलेंट’ यावर विश्वासून जातो. वस्तुस्थिती फारच वेगळी असते.

कोकण आणि परप्रांताबद्दल मनात बिलकूल आकस किंवा राग नाही; परंतु होत असलेला हा अशा पद्धतीचा अन्याय सहज दिसतो. हा अशा पद्धतीने दिसणारा अन्याय नजरेत खुपतो इतकंच! ग्रामसेवक, शिक्षक भरतीत, तर यापूर्वी अनेक वेळा अशाच पद्धतीने अन्याय होत राहिला आहे. जेव्हा संगणकावर परीक्षा व्हायला लागल्या, तेव्हाही यात काही कोणी गोलमाल करणार नाही, होणार नाही, असा समज आपण करून घेतला; परंतु या संगणकीय परीक्षांमध्येही मोठ्या प्रमाणावर घोळ झालेले आहेत. फक्त जे काही यातले घोळ कधीच ऑन पेपर पुढे आले नाहीत.

मखूप वर्षांपूर्वी जिल्हा परिषद नोकरभरती होती. त्यावेळचे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी दोन्ही अधिकारी ‘नॉन-करफ्ट’ होते; परंतु पेपर सेटिंगमध्ये जो संबंधित विभागाचा एक अधिकारी होता, त्याच्याकडून शासकीय गाडीनेच पहाटे दुसऱ्या दिवशी होणाऱ्या लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका आंबोलीत जाऊन संबंधित कोल्हापूर जिल्ह्यातील कँडिडेटना देण्यात आली होती. ते प्रकरण त्यावेळी आम्ही लिहिले होते; परंतु ज्यांचा त्यात हात होता, त्यांनी हात वर केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ते प्रकरण मिटवले. यामुळे शासकीय नोकरभरतीत, असे काही घडतच नाही. नोकरभरती पारदर्शीपणानेच झालेली असते, असं कोणी सांगत असेल, तर ते अर्धसत्य आहे. शासकीय नोकरभरती ही याच पद्धतीने होते. प्रामाणिकपणे केलेल्या अभ्यासावर विश्वासून असणाऱ्यांवर मात्र अन्यायच होतो. पेपरफुटीतून काहीजण नोकरी मिळवून जातात आणि ‘वशिला’ चालत नाही. या भाबडेपणात असणाऱ्यांची मात्र घोर निराशाच होते.

परप्रांतातून येणाऱ्यांकडून जी काही देवाण-घेवाण झाली, तर त्याची वाच्चता कुठे होत नाही. चर्चाही नसते. कोकणातील स्थानिक कँडिडेट असतील, तर त्यांची गावभर चर्चा होण्यापेक्षा परप्रांतीय कँडिडेट सिलेक्ट करायला बरे, ही खरी ‘अंदर की बात’ आहे. स्थानिकांना घेऊन मिळणार काहीच नाही. यामुळे संबंधित विभागातील अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी परप्रांतीय कँडिडेटची निवड करतात. हे गुपित नाही. तर उघड सत्य आहे. हे अर्धसत्य नव्हे तर पूर्ण सत्य आहे.
santoshw2601@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -