१८ डिसेंबरला मतदान; २० डिसेंबरला निकाल
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार १८ नोव्हेंबरला संबंधित तालुक्यातील तहसीलदार निवडणुकीची नोटीस जारी करतील. १८ डिसेंबरला मतदान होणार असून २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळणार आहे.
काही महिन्यांपूर्वी १ हजार १६५ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक झाली होती. आता २८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरु होणार असून १८ डिसेंबरला मतदान, २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. महत्वाचे म्हणजे ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचे सरपंच हे थेट जनतेतून निवडले जाणार आहेत.
असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम
तहसिलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणार : १८ नोव्हेंबर
अर्ज दाखल करण्याची मुदत : २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर
अर्ज छाननी : ०५ डिसेंबर
अर्ज मागे घेण्याचा दिनांक : ७ डिसेंबर
निवडणूक चिन्ह वाटप : ७ डिसेंबर दुपारी ३ नंतर
मतदानाची तारीख : १८ डिसेंबर
मतमोजणी आणि निकाल : २० डिसेंबर
निकालाची अधिसूचना : २३ डिसेंबर