संदीप जाधव
बोईसर : दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर वाढल्याने बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तू कालबाह्य होत आहेत. त्यामुळे बांबू व्यवसायावर संकट आले आहे. त्यातच कोरोनामुळे सततचे बदलणारे निर्बंध, बांबू पुरवठ्याचा अभाव यामुळे देखील या व्यवसायातील अडचणीत भर पडली आहे. या व्यवसायिकांना सुप, टोपले बनविण्याकरिता प्रचंड मेहनत घ्यावी लागते. परंतु वस्तु विक्रीपासून मिळणारा मोबदला अत्यल्प असतो.
हा व्यवसाय करणारे कारागिर ओल्या बांबूपासून चटया, टोपल्या, सूप, परडी व ढोल्या अशा विविध वस्तू तयार करतात. त्यामुळे ग्रामीण लोकांची धान्य व वस्तूंची साठवणूक करण्याची पूर्तता होते. या व्यवसायातील कामगार ग्रामीण भागातील बेटेगाव, नागझरी येथील आठवडी बाजारात त्यास वस्तूंची विक्री करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. वाढत्या महागाईमुळे या व्यवसायाचे पिढी दर पिढीकडून मिळालेल्या प्रशिक्षणातून अपार कष्ट करून बनविलेल्या वस्तूंची विक्री करताना आर्थिक संकटाना तोंड द्यावे लागत आहे. शासनाने आमच्या भविष्याचा विचार करून आम्हाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी आठवडी बाजारात विक्रीसाठी आलेल्या कारांगिरांकडून करण्यात येत आहे.
बोईसर पूर्वेला पूर्वी बांबूचे घनदाट जंगल होते. त्यामुळे अल्पकिमतीत बाबू मिळत होते. परंतु अलीकडे सर्वत्र शासनाने पलाटे (प्लॉट) वाटप केल्याने त्यात ओले बांबू मिळणे कठीण झाले आहे. शिवाय बाजारात प्लास्टिकच्या विविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध झाल्या आहेत. अशा परिस्थितीत जरी अप्रतिम सौंदर्यपूर्ण बांबूपासून बनविलेल्या या वस्तू असल्या तरी त्या स्वस्त दराने विकाव्या लागतात. यामुळे कामगारांना वेळप्रसंगी अर्धापोटी उपाशी रहावे लागते आहे, हेच सत्य आहे.