मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्यातले युती सरकार जबरदस्त बहुमताने जिंकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. सत्ताधाऱ्यांनी आपला अध्यक्षपदाचा उमेदवार बहुमताने निवडून आल्यामुळे फडणवीस यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे सत्ताधारी विरोधकांची आणखी काही मते खेचतात का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी लागणारा इम्पिरिकल डेटा अचूक करताना तो लवकरात लवकर न्यायालयात सादर होईल हे पाहिले जाईल, असेही ते म्हणाले.
सरसकट निर्णय बदलणार नाही
ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय सरसकट बदलणार नाही. मात्र ज्या निर्णयावर आमचा आक्षेप असेल आणि जे निर्णय जनतेसाठी योग्य नसतील ते बदलले जातील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मेट्रो कारशेड आरेतच
आरे येथे आता वृक्षतोड होणार नाही. जी झाडे तोडायची होती, ती सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनेच तोडली आहेत. तेथे २५ टक्के कामही झाले आहे. उरलेले काम झाले, तर वर्षभरात ती सुरू होऊ शकेल. तेथे चाललेल्या पर्यावरणवाद्यांची समजूत काढली जाईल. तेथे होत असलेल्या आंदोलनापैकी निम्मे आंदोलन पुरस्कृत आहे, असेही त्यांनी सांगितले. कांजूर मार्गच्या जागेचा निर्णय न्यायालयातून कधी येईल हे ठाऊक नाही. आला तरी तो कोणाच्या बाजूने असेल ते माहीत नाही. त्यानंतर चार वर्षे तेथे काम चालेल, असेही ते म्हणाले.