नवी दिल्ली (हिं.स.) : येत्या २८ जुलैपासून बर्मिंगहॅम येथे कॉमनवेल्थ गेम्ससाठी सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने कॉमनवेल्थ गेम्ससाठी ३२२ सदस्यांची घोषणा केली असून यात २१५ खेळाडू आणि १०७ अधिकारी आणि सपोर्ट स्टाफ यांचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष राजेश भंडारी यांना भारतीय संघाचे संघप्रमुख बनवण्यात आले आहे.
उत्कृष्ट खेळाडू बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्ससाठी पाठवण्यात येत आहेत. भारतीय खेळाडू मागच्या स्पर्धेच्या तुलनेत यंदा आणखी चांगली कामगिरी करतील. बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेत यंदा नेमबाजी स्पर्धेचा भाग नसल्याची माहिती भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी दिली.
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्ससाठी पाठवण्यात आलेल्या भारतीय तुकडीमध्ये ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा, पीव्ही सिंधू, मीराबाई चानू, लोव्हलिना बोरगोहेन, बजरंग पुनिया, रवी कुमार दहिया, मनिका बत्रा, विनेश फोगट, हिमा दास आणि अमित पंघल यांचा समावेश असणार आहे.