सिंधुदुर्ग : राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडीवर भाजप नेते निलेश राणेंनी मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे नशिबाने नेते झाले आहेत. त्यांचे स्वकर्तृत्व शून्य आहे. त्यांनी असे कुठले मोठे आंदोलन गाजवले आहे? असे कुठले महाराष्ट्राचे प्रश्न सोडवले आहेत? उद्धव ठाकरे म्हणतात ठाकरेंचे नाव वापरू नका. आम्ही उलट सांगतो उद्धव ठाकरेंना तुम्ही ठाकरे नाव न वापरता रस्त्यावर या… मग तुम्हाला तुमची किंमत कळेल, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे. कुडाळ येथे एका आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
उद्धव ठाकरे तुम्ही स्वकर्तृत्वाने काही केले नाही. उद्धव ठाकरेंनी आमदारक्या वाटल्या नसत्या तर मुलगा निवडूनसुद्धा आला नसता. म्हणून जमिनीवर या, तुमचे स्वकर्तृत्व काही नाही. हवेत उडायचे बंद करा. महाराष्ट्रातील जनता सगळेच बघत आहे, असेही ते म्हणाले. पक्ष संपवण्याची कुणाची इच्छाच नसते. गुवाहटीला गेलेले स्वखुशीने गेले नाहीत. उद्धव ठाकरेंमुळे त्यांना पक्ष सोडावा लागला. आम्हीही खुशीने पक्ष सोडला नाही. यामागेही उद्धव ठाकरेच होते, असेही निलेश राणे म्हणाले.
पक्षनेतृत्वाला प्रत्येक नेत्याचे म्हणणे ऐकून घायचे असते. एकनाथ शिदेंसह सर्व आमदार पक्ष संपवण्यासाठी बाहेर पडले नाही. नारायण राणे बाहेर पडताना विरोधी पक्षनेता होते, कोणाला काय पाहिजे अजून. पण यांना इज्जत नको असेल तर एक ना एक दिवस असे होते. म्हणून पक्ष संपवणे महत्त्वाचे नाही तर स्वतःच्या कर्माने पक्ष संपत जातो, अशी टीकाही राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.