Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणसीमेवरील जवानांसाठी दिवाळी फराळाचे बॉक्स

सीमेवरील जवानांसाठी दिवाळी फराळाचे बॉक्स

पनवेल (वार्ताहर) : भारत विकास परिषद, पनवेल, हिंदू नववर्ष स्वागत समिती दहिसर, आनंदवन मित्र मंडळ मुंबई, विविसू डेहरा यांच्यातर्फे सीमेवरील सैनिकांसाठी दिवाळी फराळ पाठवण्यात येणार आहे. चकली, चिवडा, लाडू, शेव भरलेले ५ हजार बॉक्स सैनिकांना पोहोचवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. सद्यस्थितीत २ हजार बॉक्स तयार झाले आहेत. यासाठी भारत विकास परिषदेचे सदस्य मेहनत घेत आहेत. गतवर्षी सैनिकांना १४ हजार लाडू पाठविण्यात आले होते.

संस्थेचे हे दुसरे वर्ष असून सैनिकांना दिवाळीसाठी फराळ पाठवण्याचे शिवधनुष्य भारत विकास परिषदने यशस्वीरित्या पेलले आहे. या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष गिरीश समुद्र, सचिव नितीन कानिटकर यांसह अन्य पदाधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यापुढेही असेच उपक्रम राबवण्याचा संस्थेचा मानस असल्याचे सुबोध भिडे यांनी सांगितले. जम्मू काश्मीर, मेघालय, मणिपूर, भुज, लेह येथील सैनिकांना दिवाळी फराळ पाठवण्यात येणार आहे. आपल्या जीवाची तमा न बाळगता सैनिक सीमेवर लढत असतात. आपण सारेजण दिवाळीत पदार्थ खातो, मात्र सीमेवर जवान आपले रक्षण करतात. आपले सैनिक घरापासून लांब असतात, त्यांना दिवाळीत घरातील कुटुंबीयांनी पाठवलेला दिवाळी फराळ खाता यावा, यासाठी त्यांना घरगुती बनवलेले पदार्थ पाठवणार आहेत. हा सारे दिवाळी फराळ दिवाळीच्या आधी सैनिकापर्यंत पोहोचवणार असल्याचे ज्योती कानिटकर यानी सांगितले.

भारत विकास परिषद पनवेल शाखेत एकूण १२८ सदस्य आहेत. लोकसहभागातून दिवाळी फराळाचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. मागील वर्षी ३७१ नागरिकांनी देणगी दिली होती. आतापर्यंत २७५ जणांनी दिवाळी फराळ कार्यक्रमाला हातभार लावलेला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -