मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्रातल्या विधानसभा सदस्यांकडून राज्यसभेवर निवडून द्यायच्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार मैदानात उभे ठाकल्यामुळे आता सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी, असा सामना आज तरी अटळ आहे. आज या निवडणुकीच्या आखाड्यात भाजपचे पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी तर काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी त्या-त्या उमेदवाराच्या पक्षाचे नेते उपस्थित होते.
शिवसेनेकडून रविवारी संजय राऊत आणि संजय पवार या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत तरी सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. सध्याच्या पक्षीय बलानुसार भारतीय जनता पार्टीचे दोन, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. उर्वरित एका जागेसाठी शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार दिला आहे.
या सहाव्या जागेवर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती उत्सुक होते; परंतु शिवसेनेने त्यांना पाठिंबा न दिल्यामुळे त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. भाजपचे पीयूष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे आणि विकास महात्मे, तर शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे पी. चिदंबरम, हे सहा सदस्य ४ जुलै रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे ही निवडणूक होत आहे.