संगमेश्वर (प्रतिनिधी ) : देशासाठी शहीद झालेल्या जवानांना (soldiers) आगळीवेगळी श्रध्दांजली वाहण्याच्या दृष्टीने भुवनेशकुमार गुर्जर याने पदयात्रा सुरु केली असून मजल दरमजल करत तो संगमेश्वर गावमळा येथील हॉटेल राजमुद्रा येथे पोहचला असता संगमेश्वरवासीयांच्या वतीने अविनाश सप्रे यांनी भुवनेशकुमारचे स्वागत केले.
भुवनेशकुमारने ८ ऑगस्ट २०२२ रोजी दिल्ली येथून आपल्या पदयात्रेला प्रारंभ केला आहे. बालपणापासून त्याला सैनिकांबाबत कुतूहल, आस्था वाटत आली आहे. सैनिकांचे शौर्य पाहून नेहमीच आपला उर अभिमानाने भरुन येतो. मात्र लढाई अथवा दहशतवाद विरोधी कारवाई दरम्यान सैनिकांना वीरमरण येते त्यावेळी मनाची समजूत घालणे कठीण होते. अशा वीरगती प्राप्त शहीद सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करुन त्यांना आगळीवेगळी श्रध्दांजली वाहण्यासाठी आपल्या मनात २८ राज्य आणि १५ हजार ६०३ किमी अंतर पायी प्रवासाची संकल्पना सुचली आणि त्याला ८ ऑगस्ट २०२२ रोजी दिल्ली येथे आपण मूर्त रुप दिल्याचे भुवनेशकुमारने सांगितले.
Narayan Rane : नारायण राणे यांनी दिली आरोग्य व्यवस्थेला बळकटी
दिवसा किमान ३० ते ४० किमी अंतर चालायचे आणि रात्रीच्या वेळेला गेस्ट हाऊस, मंदिर, धर्मशाळा, हॉटेल येथे मुक्काम करायचा असा आपला नेम असल्याचे भुवनेशकुमारने सांगितले. पदयात्रेदरम्यान अनेकांचे सहकार्य लाभत आहे. दानशूर व्यक्ती, संस्था, शाळा – महाविद्यालये, हॉटेल व्यावसायिकआपल्याला मदत करत असल्याचे त्याने नमूद केले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये शहीद जवानांच्या नावाने अमरज्योती अथवा शाळा सुरु व्हाव्यात जेणेकरून पुढील पिढीला देशासाठी बलिदान केलेल्या जवानांच्या शौर्यगाथा कळू शकतील, असाही पदयात्रेचा हेतू असल्याचे भुवनेशकुमार गुर्जरने सांगितले.