भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात जास्त नागरिक हे विना मास्क फिरताना दिसतात. तसेच काही फेरीवाले व भाजीविक्रेते, दुकानदार, व्यवसायिक देखील मास्कचा वापर न करताना आढळून येतात. अशा व्यक्तींवर व फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची सूचना देण्यात आली आहे.
त्याचबरोबर अशा बेजबाबदार नागरिकांवर महानगरपालिका व पोलीस प्रशासन एकत्र मिळून कारवाई करणार असल्याचे आयुक्त यांनी सांगितले आहे.
मागील काही दिवसांत राज्यात तसेच मीरा-भाईंदर शहरात कोविड रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मीरा-भाईंदर महानगरपालिका सज्ज झाली असून त्या आनुषंगाने आयुक्त दिलीप ढोले यांनी ०१ जानेवारी रोजी आपत्कालीन बैठक आयोजित केली होती.
प्रभाग क्रमांक २ च्या अंतर्गत रस्त्यावर विना मास्क फिरणाऱ्या, दुकानात गर्दी जमा करून मास्कचा वापर न करणाऱ्या,भाजीविक्री करताना मास्क न वापरणाऱ्या सर्व बेजबाबदार दुकानदार, नागरिक यांच्याकडून कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड वसूल करण्यात आला आहे.
मास्कचा वापर न करणाऱ्यांकडून प्रभाग २ अंतर्गत एकूण ११ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती प्रभाग अधिकारी प्रियंका भोसले यांनी दिली आहे. सर्वांनी मास्कचा वापर करा व कोविड नियमांचे पालन करावे, असे देखील भोसले यांनी सांगितले आहे.