नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी ९ हजार ८०० कोटी रुपयांचा शरयू बंधारा राष्ट्रीय प्रकल्प देशाला समर्पित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी दुपारी उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथील शरयू बंधारा राष्ट्रीय प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या दरम्यान त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या विरोधी पक्षांवर निशाणा साधल्याचेही दिसून आले.
यावेळी मोदी म्हणाले, मी वाटच पाहत होतो, की कधी कोण एखाद्या योजनेचे श्रेय घेण्याचा दावा करेल. पंतप्रधान मोदींचे हे विधान समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या त्या विधानानंतर आले, ज्यामध्ये अखिलेश यादव यांनी दावा केला होता की, हा प्रकल्प समाजवादी पार्टी सरकारच्या काळातच तीन चतुर्थांश तयार झाला होता.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, या प्रकल्पात जेवढे काम पाच दशकात होऊ शकले होते, त्यापेक्षा जास्त काम आम्ही पाच वर्षांच्या अगोदर करून दाखवले. हे डबल इंजीनचे सरकार आहे, हीच डबल इंजीनच्या सरकारच्या कामाची गती आहे.
या अगोदर सकाळी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ट्वीट करत म्हटले होते की, “समाजवादी पार्टीच्या कार्यकाळात तीन चतुर्थांश तयार झालेल्या शरयू राष्ट्रीय प्रकल्पाच्या उरलेल्या कामाला पूर्ण करण्यात उत्तर प्रदेश भाजप सरकारने पाच वर्षे लावली. २०२२ मध्ये पुन्हा एकदा समाजवादी पार्टीचे युग येईल.” त्या अनुषंगाने पंतप्रधान मोदी यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे.