Friday, March 29, 2024
Homeताज्या घडामोडीनाताळ व नववर्षदिनावर कोरोनाचे सावट

नाताळ व नववर्षदिनावर कोरोनाचे सावट

पालघर  : गेल्या काही दिवसांपासून वसई-विरार भागात पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन सावध झाले आहे. कोविड १९ चे रुग्ण वाढत असताना मंगळवारी ओमायक्रॉनचा रुग्ण सापडल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
सदर परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने ३१ व्या वसई तालुका कला-क्रीडा महोत्सवास परवानगी नाकारली आहे. तसेच, नाताळ व नववर्षदिन साजरा करण्यावरही निर्बंध येण्याची शक्यता आहे. वसई तालुक्यात नाताळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. तालुक्याच्या ग्रामीण भागात ख्रिस्ती समाज मोठ्या संख्येने राहतो. नाताळच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.


गेल्या वर्षी कोविड १९ चा प्रादुर्भाव वाढल्यामुळे या समाजाने नाताळ साधेपणाने साजरा केला होता. तथापि, गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे समाजात आनंदाचे वातावरण पसरले होते. परंतु, गेल्या १० दिवसांपासून पुन्हा रुग्ण सापडल्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन मनपाने ३१ व्या वसई तालुका कला-क्रीडा महोत्सव पुढे ढकलण्याची आयोजकांना विनंती केली आहे. त्यामुळे यंदाही नाताळ अत्यंत साधेपणाने साजरा होणार आहे.


तसेच, नववर्षदिन साजरा करण्यासाठी वसई विरारच्या समुद्रकिनारी असलेल्या रिसॉर्टसमधील होणाऱ्या कार्यक्रमांवर जिल्हा प्रशासनाने बंदी आणावी, अशी मागणी करण्यात येत आहे. रिसॉर्ट्सना बंदी असतानाही अर्नाळा, कळंब व नवापूर येथील रिसॉर्ट्समध्ये दर शनिवार व रविवार असे दोन दिवस पर्यटकांची तुफान गर्दी होत असते. पोलिसांना मॅनेज करून अनधिकृत रिसॉर्टस मालक गेले वर्षभर धुमाकूळ घालत आहेत.


गर्दी रोखण्याची मागणी


नालासोपारा येथे ओमायक्रॉनचा रुग्ण सापडल्यामुळे जिल्हा व पोलीस यंत्रणेने रिसॉर्ट्समध्ये होणारी पर्यटकांची गर्दी रोखवी, अशी मागणी ग्रामीण भागातील जनतेकडून होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -