ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे ग्रामीण एलसीबीच्या अधिकाऱ्यांनी थिनरने भरलेला टँकर सिल्व्हासा येथून गोवा येथील कंपनीत जात असताना योग्य कागदपत्र नसल्याने अडकवून ठेवला होता. तसेच टँकर सोडविण्यासाठी व टँकर मालकाला अटक न करण्यासाठी फिर्यादी संदीप सिंह यांच्याकडे तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
सदर एलसीबी ठाणे ग्रामीणचे तपास अधिकारी व त्यांचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनी त्यांच्यावतीने लाच स्वीकारण्यासाठी त्यांचा दलाल हिंमत ऊर्फ हेमराज हिरजी नंदा यास ठाणे आरटीओजवळील हॉटेलमध्ये बोलवले होते, अशी तक्रार संदीप सिंह यांनी ऑगस्ट २००३ मध्ये केली होती.
या प्रकरणी मुंबई लाचलुचपत कार्यालयात संदीप यांनी महासंचालकांची भेट घेऊन तक्रार केली. याप्रकरणी मुंबई येथील अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी विनंती केली. फिर्यादीच्या विनंतीवरून महासंचालकांनी सहाय्यक पोलीस आयुक्त विलास तुपे, रमेश महाले आणि इतर अधिकारी व अंमलदार यांचे पथक कामगिरीवर नेमले. ठाणे येथील सदर हॉटेलमध्ये सापळा लावला असता, ठाणे ग्रामीण पोलिसांचा दलाल हेमराज हिरजी नंदा रात्री ११ वा. हॉटेलमध्ये आला. त्याने सदर लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यास रंगेहाथ पकडले होते.