रत्नागिरी : मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. आता कोकणातही कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असून, मागील २४ तासांत, शंभर नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार मागील २४ तासांत कोरोनाचे नवीन १०० रुग्ण बाधित झाले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागासह नागरिकांसाठी चिंतेची बाब ठरली आहे.
दुसरीकडे, कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मागील आठ दिवसांत जिल्ह्यातील रुग्ण सातत्याने वाढत आहेत. दोन दिवसांत पावणे दोनशेहून अधिक रुग्ण सापडले आहेत. चोवीस तासांत १०५३ रुग्णांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये शंभर नवे रुग्ण सापडले आहेत. १६ जणांना बरे वाटल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात सध्या ३१५ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यामध्ये २३४ गृहविलगीकरणात, तर ८१ रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात मागील चोवीस तासांत चिपळूण तालुक्यात सर्वाधिक २८ रुग्ण सापडले आहेत. तर रत्नागिरीत १७, दापोली १९, खेड १५, गुहागर ६, राजापूर ८, लांजा ३, संगमेश्वर व मंडणगडमध्ये प्रत्येकी १ रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात चिपळूण येथील रूग्णसंख्या वाढ मोठी असून, त्यापाठोपाठ रत्नागिरी, दापोली, खेड येथील संशयित कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे.